Saturday, June 27, 2020

अजित डोवाल

 अजित डोवाल
गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
एका गुप्तहेराची चित्तथरारक कहाणी

लेखक - अविनाश थोरात

तुम्ही अभिनेता अक्षयकुमारचा बेबी हा सिनेमा पाहिलाय का? ह्यात एका प्रसंगात गुप्तहेर असलेल्या अक्षयकुमार समोर मंत्रीमहोदय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराजवळ मिशनच्या यशस्वितेबाबत शंका उपस्थित करतात. सुरक्षा सल्लागार अतिशय शांतपणे "अगर अजयको (अक्षयकुमार) कुछ हो जाता है तो we will disown him!" असं सांगतात. आणि महदाश्चर्याची गोष्ट अशी की तो गुप्तहेरही ही गोष्ट तितक्याच थंडपणाने स्वीकारतो.
 पकडले गेल्यास देशाकडून आपले अस्तित्वच नाकारले जाईल. कितीही उच्च कामगिरी केली तरी त्यासाठी कधीही गौरव होणार नाही. हे माहीत असूनही देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या गुप्तहेरांच्या अज्ञात जगाची तोंडओळख आपल्याला अजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - एका गुप्तहेराची चित्तथरारक कहाणी या छोटेखानी पुस्तकातून होते.
हे पुस्तक जरी 'चरीत्र' या सदरात मोडणारे वाटले तरीही ते रुढार्थाने चरीत्र नाही. अजित डोवाल यांच्या कारकीर्दीतील काही महत्त्वाचे अंशमात्र आहे.
   एका गुप्तहेराच्या कामगिरीबद्दल फार माहिती नसणे यातच त्याचे खरे यश सामावलेले असते. म्हणूनच गुप्तहेर डोवाल यांच्याबद्दल सामान्य माणसाला माहिती नाही. मात्र इंटेलिजन्स ब्युरोमधून निवृत्त झाल्यावर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण या क्षेत्रामध्ये काम सुरू केले. हेरगिरी ते मुत्सद्देगिरी या प्रवासात अजितकुमार डोवाल यांनी देशासाठी केलेल्या कामगिरीची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी पत्रकार, लेखक अविनाश थोरात यांनी हे पुस्तक लिहिले. अविनाश थोरात हे सध्या 'लोकमत'च्या पुणे आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत. समाजकारण, राजकारण तसेच अंतर्गत सुरक्षा हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.
    उत्तराखंड राज्यातील पौरीगढ़वाल येथे जन्मलेल्या डोवाल यांनी आग्रा विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते भारतीय पोलिस सेवेत रुजू झाले. केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील थ्यालसेरी येथे सेवेत असताना दोन धर्मांमध्ये उसळलेल्या दंगलीला त्यांनी अतिशय कौशल्याने नियंत्रणात आणले. त्यासाठी त्यांना बढती मिळून  जिल्हा पोलिस अधीक्षक हे पद मिळणार असताना त्यांनी ते नाकारुन इंटेलिजन्स ब्युरोत प्रवेश केला.
  ब्रिटीशांनी १८८५ मध्ये स्थापन केलेली इंटेलिजन्स ब्युरो ही भारतातील सर्वात जुनी संस्था आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याची पुनर्रचना करण्यात आली. गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी ही संस्था प्रामुख्याने भारतविरोधी कारवाया करणाऱ्या संघटनांची माहिती काढते. आपल्या खब-यांच्या साह्याने देशांतर्गत गुप्त माहिती संकलन आणि विश्लेषण यासह इंटेलिजन्स ब्युरोचे सीमावर्ती भागातही लक्ष असते. इंटेलिजन्स ब्युरोसाठी स्वतंत्र नियुक्त्या होत असल्या तरी आयबीतील प्रमुख अधिकारी हे पोलिस दलातील (आयपीएस) अधिकारी असतात. आयबीचा प्रमुखही भारतीय पोलिस दलातीलच ज्येष्ठ अधिकारी असतो. संपूर्ण देशात विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना इंटेलिजन्स ब्युरोमध्ये समाविष्ट केले जाते. त्यासाठी त्यांना अनेक परीक्षांमधून जावे लागते. त्यांना साध्या वेशात गुप्त माहिती गोळा करावी लागते. त्याकरिता त्यांना ड्रगमाफियांपासून दहशतवाद्यांपर्यंत सर्वच ठिकाणी आपली खरी ओळख उघड न होऊ देता वावरावे लागते. प्रसंगी वेशांतरही करावे लागते. 
   अजित डोवाल यांची गुप्तहेर म्हणून प्रथम नियुक्ती झाली ती मिझोरामची राजधानी ऐझवाल येथे. तेथे त्यांना मिझो बंडखोरांपर्यंत पोहचून त्यांना भारत सरकारसोबत समझोता करार करण्यासाठी तयार करायचे होते. केवळ परिवारच नाही तर आर्मीच्याही संपर्कात त्यांना राहता येणार नव्हते. मिझो बंडखोरांच्या विश्वास संपादनासाठी त्यांनी स्वतःची प्रतिमा खतरनाक बंडखोर अशी तयार केली. लष्करी अधिकाऱ्यांनी तर त्यांना खरेच बंडखोर समजून संपवण्याची तयारीही केली होती. नंतर त्यांना डोवाल हा आपलाच माणूस असल्याचे कळले आणि डोवाल वाचले. तसेच डोवाल यांनी सिक्कीम राज्याच्या विलिनीकरणासाठी सुध्दा महत्वपूर्ण कार्य केले. 
भारत - पाकिस्तान संबंधांबद्दल नव्याने सांगायला नको. पाकिस्तानात नियुक्ती होणे ही कोणत्याही गुप्तहेरासाठी सर्वात मोठी संधी आणि आव्हानही असते. अजित डोवाल पाकिस्तानात सात वर्षे राहिले. पाकिस्तानाच्या अणुकार्यक्रमाची माहिती पुरवणे आणि खलिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात राहून भारताला त्यांच्या कारवायांबद्दल जागरुक करणे, ही महत्त्वाची कामगिरी डोवाल यांनी बजाविली.
Operation Black thunder च्या वेळी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपलेल्या अतिरेक्यांना आपण ISI चे एजंट असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना आत्मसमर्पण करण्यास राजी केले. ह्या कारवाईत त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी डोवाल यांना कीर्तिचक्र प्रदान करण्यात आले. कीर्तिचक्र मिळवणारे देशातील ते एकमेव पोलिस अधिकारी आहेत.
    कंदाहार विमान अपहरण प्रकरणी भारताचे कमीत कमी नुकसान होऊन प्रवासी सुखरुपपणे कसे परत येतील ह्याला प्राधान्य दिले.
पुढे कारगिल, operation दाऊद इब्राहिम,इशरत जहान प्रकरण आणि अन्य प्रकरणांमधून अजित डोवाल यांच्या कामगिरीची माहिती मिळते. 
  पठाणकोट हल्ला आणि उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकमुळे देशवासियांमध्ये राष्ट्रभावना निर्माण झाली.  बचावात्मक आक्रमणाचा सिध्दांत अजित डोवाल यांनी मांडला. दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आता defensive offence (बचावात्मक आक्रमण) चा पवित्रा घेतला आहे.
पुस्तक छोटेखानी असले तरी माहितीपूर्ण आहे. 

© श्वेता  चिमोटे

No comments:

Post a Comment

मी संसार माझा रेखिते

  "दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेऽऽखिते..."   सुखी संसार मांडण्याची, तो नीटनेटका, आखीवरेखीव करण्याची स्वप्नं थोड्याफार फ...